
पालघर, प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारा शिवराज्याभिषेक सोहळा वालधर शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आकर्षक ऐतिहासिक देखावा, शिवकालीन सजावट आणि महाराजांच्या राज्याभिषेकाची भव्य प्रतिकृती यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्याला पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक आरिफ कलाडिया, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेवक चंद्रशेखर {बंड्या} वाडे ,तसेच सुनील महेंद्रकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व विविध महिला , शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजातील युवकांनी घ्यावा, असे आवाहन केले. शिवराज्याभिषेक हा केवळ ऐतिहासिक सोहळा नसून स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाची प्रेरणा देणारा दिवस असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या भव्य सजावटीने आणि शिवकालीन वातावरणाची अनुभूती देणाऱ्या देखाव्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. महिला पदाधिकारी, युवक आणि शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला यशस्वी केले.
वालधर शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले असून उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
