
डहाणू : डहाणू परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ आणि निसर्गाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येत भावनिक व शांततापूर्ण कॅंडल मार्च आयोजित केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
जनता बँक ते डहाणू स्टेशन आणि तेथून बस डेपो परिसरापर्यंत नागरिकांनी हातात मेणबत्त्या व पर्यावरण जनजागृतीचे फलक घेऊन शांततेत मार्च काढला. “झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा आणि डहाणू वाचवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वृक्षतोडीमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटाबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
या आंदोलनात वसीम पठाण, अमित सोरठी, हेमांग शेठ, कुंदन राऊत, जयेश पाटील, नचिकेत देशमुख, अजय शिर्के, श्रद्धा पाटील मॅडम, पाटील सर, फिरोज जमशेदजी, जगदीश चौहाण, संज्योत राऊत, भूपेंद्र राऊत व त्यांची छोटी मुलगी, संतोष जैस्वाल, सुधाकर राऊत, हेमंत माळी, देवेंद्र माळी, वेदांत सुर्वे, तायडे सर आणि ललित राऊत यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी सहभाग घेतला.
मार्चच्या शेवटी झाडांना प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी “आज झाडे पडली आहेत, उद्या माणसाचा श्वास पडेल” असा भावनिक संदेश देत वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.
नागरिकांनी प्रशासनाला आवाहन करत म्हटले की, विकासाच्या नावाखाली होणारी अनियंत्रित वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. डहाणूसारख्या निसर्गसंपन्न शहराचे हिरवे वैभव जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
🌳 “निसर्ग वाचवा, डहाणू वाचवा… हिरवाई हीच खरी श्रीमंती!”