
मुंबई: देशातील पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांचे वाढते छळ आणि सुरक्षेच्या प्रश्नावर ‘इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन’ (IJA) आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरैशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या विविध न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
”आवाज उठणार, अधिकार मिळणार!”
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या संरक्षणासाठी संघटनेने “आवाज उठणार, अधिकार मिळणार!” असा नारा दिला आहे. या मोहिमेद्वारे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पत्रकारांच्या प्रमुख ५ मागण्या:
पत्रकार छळ थांबवा: पत्रकारांवर होणारे अत्याचार आणि खोट्या गुन्ह्यांची मालिका तात्काळ थांबवण्यात यावी.
पत्रकार संरक्षण कायदा: पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी विशेष ‘पत्रकार संरक्षण कायदा’ लवकरात लवकर लागू करावा.
चौथ्या स्तंभाची सुरक्षा: लोकशाहीचा आधारवड असलेल्या प्रसारमाध्यमांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करावा.
राष्ट्रीय पत्रकार नोंदणी (रजिस्टर): देशभरातील सर्व अधिकृत पत्रकारांची एक राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करण्यात यावी.
पत्रकार मतदार संघ: पत्रकारांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिनिधीत्वासाठी स्वतंत्र पत्रकार मतदार संघाची निर्मिती करावी.
हुतात्मा पत्रकारांना अभिवादन
यावेळी “पत्रकार एकता जिंदाबाद” आणि “हुतात्मा पत्रकार अमर रहे” अशा घोषणा देत, कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पत्रकारिता हा गुन्हा नसून (Journalism is not a crime), तो लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असेही संघटनेने ठामपणे मांडले आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन ही पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी जगातील एक मोठी संघटना असल्याचा दावा यावेळी करण्यात आला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार सेराज अहमद कुरैशी यांनी व्यक्त केला आहे.
