
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि अंतर्गत मार्गांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसलेल्या गायी-बैलांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अचानक वाहनांसमोर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपरिषदेने आता ठोस मोहीम राबवावी
मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून सार्वजनिक सुरक्षितता, स्वच्छता आणि शहराच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. त्यामुळे पालघर नगरपरिषदेने संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून विशेष पथक नियुक्त करावे, रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे पकडावीत आणि त्यांच्यासाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर जनावरे सोडणाऱ्या मालकांचा शोध घेऊन नियमानुसार दंडात्मक कारवाई आणि वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. केवळ जनावरे पकडून पुन्हा त्याच परिसरात सोडली गेली, तर ही मोहीम केवळ दिखावा ठरण्याची शक्यता आहे.
जनावरांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करा
गाय, बैल अथवा इतर पशुधन रस्त्यावर मोकाट सोडण्याची जबाबदारी संबंधित पशुमालकांवर निश्चित होणे आवश्यक आहे. जनावरांचे संगोपन करण्यासोबतच त्यांना सार्वजनिक रस्त्यावर सोडले जाणार नाही, याची काळजी घेणे ही मालकांची जबाबदारी आहे.
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने जनावरे मोकळी सोडणाऱ्यांवर नगरपरिषद प्रशासनाने नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचा थेट सवाल
पालघर शहरातील नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कारवाई अपेक्षित आहे. मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता नगरपरिषदेने तातडीने विशेष मोहीम राबवावी, जनावरांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करावी आणि सुरक्षिततेच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई करावी.
मोकाट जनावरे रस्त्यावर, नागरिकांचा जीव धोक्यात आणि प्रशासन मात्र शांत — ही परिस्थिती आणखी किती दिवस चालणार?
पालघर नगर परिषद आता या गंभीर प्रश्नावर नेमकी कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.